''महाराज, मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे- १. सक्लेश म्हणजे चिकटलेले असे चित्त २. श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त ३. सकृदायामी व्यक्तीचे चित्त ४. आनागामी व्यक्तीचे चित्त ५. अर्हत व्यक्तीचे चित्त ६. प्रत्येक बुध्दाचे चित्त आणि ७. सम्यक सम्बुध्दाचे चित्त.
१. संक्लेश चित्त
''महाराज, लालसेच्या आहारी गेलेले ( रागयुक्त ), दुष्ट मोहात बुडालेले, क्लेशांच्या भोवर्यात सापडलेले चित्त ( मन ) कृत्याची व प्रज्ञेची जाणीव नसलेले अशा लोकांचे चित्त किंवा मन अतिशय जड, विकृत आणि मंद असते.
''ते का बरे? ''
''कारण की, त्यांच्या चित्ताला शिक्षण मिळालेले नसते. म्हणजे त्यावर सुसंस्कार जडलेले नसतात.
''महाराज, समजा एखादा वेळू त्याच्या रांजीतून काढावयाचा असल्यास तो कधीही सहजपणे काढता येणार नाही़. हे काम अत्यंत युक्ती, प्रयुक्ती व हळूहळू करावे लागते. कारण अवाढव्य वाढलेला वेळू आपल्या अनंत व विशाल शाखा संपूर्ण रांजीत पसरविल्यामुळे त्याची परस्परात चांगलीच गुंतागुंत झालेली असते. अशारीतीने फसलेला वेळू कापून काढणे अत्यंत कठीण असते. महाराज, याच उदाहरणाप्रमाणे लालसेच्या आहारी गेलेले.... जे लोक असतात त्यांचे चित्त अतिशय जड, विकृत आणि मंद असते. ''
''ते का बरे? '' तर सालसादी क्लेशांच्या रांजीत पूर्णतः त्याची गुंतागुंत होऊन फसल्यामुळे होय. या सात प्रकारच्या चित्तांपैकी हा पहिला प्रकार होय.
२. श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त
''दुसर्या प्रकारचे चित्त याहून वेगळे असते. महाराज, ज्यांनी श्रोतापन्नपदाचा लाभ करुन घेतला आहे, जे कधीही वाईट मार्गाने जात नाहीत, ज्यांनी सत्य ओळखले आहे आणि ज्यांना भगवान बुध्दाच्या धर्माची जाणीव झाली आहे अशा लोकांचे चित्त, आत्मभाव, कर्मकांड आणि शंका या तीन भ्रममूलक विषयापासून एकदम मुक्त, हलके व गतीमान होत असते. तथापि वरच्या ( आर्यमार्ग ) विषयात त्याला विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येतात. कारण त्याबाबतीत ते जड, विकृत आणि मंदच असते. म्हणून त्यांची कार्य ही मंदगतीनेच चालतात. ''
''ते का बरे? '' तर तीन विषयात चित्त एकदम परिपूर्ण परिशुध्द झालेले असते. तथापि बाकीच्या अवस्थांचे बाबतीत चित्ताचे क्लेश ( मळ ) मात्र कायम असतात. महाराज, ज्याप्रमाणे वेळूवांच्या रांजीतील वेळू कापून काढताना तीन पेरांपर्यंत शाखा तोडून साफ केल्यामुळे आणि बाकी वरच्या शाखा तशाच त्या रांजीत गुंतलेल्या अवस्थेत सोडून दिल्यामुळे वेळू ओढताना तीन पेरांपर्यंत पकडावयास किंवा ओढावयास कठीण जाणार नाही़. परंतु बाकी वरचा भाग ओढने अशक्य व कठीणच होते.''
''ते का बरे? ''
''खालचा भाग कापून साफ केला असला तरी वरचा भाग तसाच सोडून दिला आहे. महाराज, याप्रमाणेच ज्यांनी श्रोतापन्नपदाचा लाभ केला आहे... अशा लोकांचे चित्त, आत्मभाव, कर्मकांड आणि शंका या तीन भ्रममूलक विषयांपासून एकदम मुक्त, हलके व गतीमान होत असते. तरीपण वरच्या विषयावरील त्याला विचार शक्तीच्या कार्यात अडचणी येतात. कारण त्याबाबतीत ते जड, विकृत आणि मंदच असते. ते का म्हणून? तर, ह्या तीन भ्रममूलक बाबी दूर झाल्या असल्या तरी बाकीचे क्लेश अवशिष्ट असल्यामुळेच असे घडते. दुसर्या प्रकारचे चित्त हे असे आहे.
३. सकृदागामी व्यक्तीचे चित्त
''तिसर्या प्रकारचे चित्त या दोन्ही प्रकाराहूनही वेगळे असते. ''महाराज, लालसा, द्वेष आणि मोह हे केवळ नाममात्र राहिले आहेत. अशा सकृदागामी व्यक्तीचे चित्त पाच अवस्थांत एकदम हलके व गतीमान असते. परंतु यापेक्षा उंच अवस्थांत जड, विकृत आणि मंद असते. कारण जीवनातील खालच्या दर्जाच्या पाच अवस्थांपर्यंत चित्त परिशुध्द झालेले असले तरी वरच्या अवस्थांत क्लेश अजून शिल्लकच असते. हे असे घडते- महाराज, वेळूवाच्या रांजीमधून कापून काढत असता वेळू पाच पेरांपर्यंत एकदम गुंतलेल्या शाखा प्रशाखा साफ केल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढावयास मुळीच कठीण जाणार नाही. परंतु वरच्या शाखा प्रशाखा अजून रांजीत परस्परात गुंतुन असल्यामुळे तो भाग ओढून काढण्यास बरीच अडचण जाते. का की, वेळू खाली पाच पेरांपर्यंत साफ केलेला असला तरी उरलेला वरचा भाग साफ न करता असाच सोडून देण्यात आला आहे. महाराज, याप्रमाणेच ज्यांनी सकृदागामी पदाचा लाभ करुन घेतला आहे, त्यांचे चित्त जीवनातील पाच कनिष्ठ अवस्थांपर्यंत एकदम दृतगतीने high speed विचार कार्य करीत असते. का की, येथे ते हलके आणि गतीमान असते. तरीपण यापेक्षा वरच्या अवस्थांत जड आणि मंदच असते. हे तिसर्या प्रकारचे चित्त समजावे.''
४. अनागामी व्यक्तीचे चित्त
''चौथ्या प्रकारचे चित्त याहून वेगळे असते.''
''महाराज, ज्यांनी अनागामी नावाची वरची अवस्था गाठली, त्यांचे पाच बंधन आपोआप गळून पडतात आणि जीवनाच्या दहा अवस्थांपर्यंत त्यांचे चित्त एकदम साफ झालेले असते. म्हणून येथपर्यंत विचारशक्ती सुलभतेने व तत्परतेने कार्य करीत असते. का की, चित्त हलके आणि गतीमान असते. परंतु याहीपेक्षा वरच्या भूमीत चित्तास कार्य करावयास बर्याच अडचणी येतात. कारण येथे चित्त जड आणि मंद असते. का की, दहा स्थानांपर्यंत चित्त एकदम परिशुध्द झाले असले तरीपण वरच्या अवस्थेतील चित्तमळ अजून अवशिष्ट असतात. महाराज, वेळवाच्या रांजीतून वेळू कापून काढत असता दहा पेरांपर्यंत समस्त शाखा प्रशाखा तोडून काढल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढणे कठीण नाही़... महाराज, असेच आहे अनागामी अवस्था प्राप्त करणार्या व्यक्तीचे चैतासिक दहा स्थानांपर्यंत चित्त दृतगतीने कार्य करण्यास त्यास कठीण जात नाही़, परंतु यापेक्षा वरच्या भूमीत अत्यंत कठीण व मंद गतीने कार्य करणे भाग पडते. का की, दहा स्थानांपर्यंत चित्त एकदमच परिशुध्द झालेले असले तरी बाकीच्या वरच्या अवस्थांत अजून क्लेश शिल्लक राहिलेले आहेत. असे अनागामी पदाचा लाभ करणारे व्यक्ती पुन्हा मानवी जगात कधीही येत नाही. ह्यांचे चित्त चौथ्या प्रकारचे चित्त होय.''
५. अर्हतपद प्राप्त व्यक्तीचे चित्त
''पाचव्या प्रकारचे चित्त वरील चार चित्ताहून एकदम वेगळे आहे.
''महाराज, ज्यांनी अर्हतपदाचा लाभ करुन घेतला आहे. ज्यांचे चारही आश्रव तुटून पडले, ज्यांचे क्लेश-मळ सर्वस्वी नाहीसे झाले, चित्त निर्मळ व स्वच्छ झाले, ज्यांचे ब्रह्मचर्य जीवन सफल झाले, अडचणीचे ओझे उतरले, कार्यसिध्दी पूर्णं झाली, ज्यांना सत्यज्ञानाचा साक्षात्कार झाला, ज्यांचे समस्त भावबंधणे नष्ट होऊन चित्त पुर्णत: विशुद्ध झाले. त्यामुळे आता पुनर्जन्माची बेडी कायमची तुटली. श्रावकांनी मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत ज्यांच्या चित्ताने सफलता प्राप्त केली आहे. म्हणजे यांत ते हलके व तत्पर आहे. परंतु प्रत्येक बुध्दाच्या भूमी संबंधाने ते अजूनही जड व मंदच असते. ते का बरे? श्रावकाच्या भूमीकेत त्याचे चित्त एकदम परिशुध्द झाले असले, तरी प्रत्येक बुध्दाच्या भूमीके संबंधाने अजून शुद्ध झालेले नाही.
''महाराज, वेळवाची संपूर्ण रांज तोडून एकदम साफ केली असता त्यातील कोणताही वेळू सहजपणे ओढून काढता येतो. महाराज, त्याचप्रमाणे अर्हतपद प्राप्त केलेल्या व्यक्तीचे असते. श्रावकाने मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत त्यांचे चित्त एकदम हलके व दृतगतीने कार्य करणारे असले तरी प्रत्येक बुध्दाच्या भूमीकेत जड व मंद गतीनेच त्याला कार्य करावी लागतात. हेच आहे पाचव्या प्रकारचे चित्त.
६. प्रत्येक बुध्दाचे चित्त
''सहाव्या प्रकारचे चित्त पाचही चित्ताहून वेगळे असते. महाराज, ते म्हणजे प्रत्येक बुध्दचित्त. ते स्वतः चा आधार स्वयंमच असतात, त्यांना दुसर्यावर अवलंबून राहण्याची अवश्यकता नसते, त्यांचा कोणी गुरु किंवा आचार्य नसतो. त्यांचे वास्तव्य गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकट्याचेच असते, ते आपल्या जीवनात एकदम निर्मळ व परिशुध्द झालेले असतात, त्यांच्यात कसल्याही प्रकारचा दोष नसतो. त्यांचे चित्त स्वतः संबंधाने अतिशय हलके व गतीमान असते. परंतु सम्यक सम्बुध्दाच्या क्षेत्राच्या बाबतीत जड व मंदच असते. का की, जरी ते प्रत्येक बुध्दाच्या विषयी बिल्कूल परिशुध्द व निर्मळ असले तरीपण सर्वज्ञ बुध्दाचे क्षेत्र विशाल आहे. जे स्वतः प्रज्ञावंत असून दुसर्यांना देखील प्रज्ञेच्या मार्गाने नेतात ते सर्वज्ञ बुध्द होत. असे तरी का व्हावे, तर प्रत्येक बुध्द स्वतः च्या क्षेत्रामध्ये एकदम निष्कलंक असले तरी सम्यक सम्बुध्दाचे क्षेत्र इतके विस्तृत असते की सामान्य बुध्द पोहचूच शकत नाही. त्याच्या चित्ताच्या कार्यशक्तीला तोड नाही़.
''महाराज, समजा एखादा माणूस आपल्या परिसरातील लहान ओढे किंवा लहान नदी तो स्वतः च्या इच्छेनुसार कधीही पार करतो. मग तो दिवस असो की रात्र असो त्याला कशाची भीती वाटत नाही़, परंतु अत्यंत खोल, विशाल, अथांग आणि ज्याचा किनारा दृष्टीस पडत नाही असा महान समुद्र जर त्याने पाहिले तर त्यास काय वाटेल? तो भयभीत होईल आणि पलीकडे जाण्याची हिम्मत चूकूनही करणार नाही. असेच प्रत्येक बुध्दाचे. ते का बरे? तर का की, आपल्या क्षेत्रातील नदीशी तो पूर्णपणे परिचित आहे. परंतु महान समुद्र विशाल आहे. हाच चित्ताचा सहावा प्रकार आहे.''
७. सम्यक सम्बुध्दाचे चित्त
सातव्या प्रकारचे चित्त या सहाही चित्तांहून पूर्णतः वेगळे असते.
''महाराज, ज्यांनी सम्यक सम्बुध्दत्व प्राप्त केले त्यांना जगातील सर्वच प्रकारचे ज्ञान असते. अर्थात ते सर्वज्ञ असतात. त्यांना दहा प्रकारची शक्ती लाभलेली असते. म्हणूनच ते दशबल या नावाने संबोधिले जातात. चार प्रकारच्या विशेष ज्ञानावर त्यांचा आत्मविश्वास असतो. बुध्द धर्माची १८ लक्षणे त्यांचे अंगी असतात. त्यांचे इंद्रिये पूर्णतः ताब्यात असतात. त्यांच्या आकलन शक्तीपासून काहीही लपून राहू शकत नाही. अर्थात त्यांचे ज्ञान सर्वत्रगामी असते. समस्त क्षेत्रात त्यांचे चित्त तेजस्वी आणि दृतगामी असते. का की, ते सर्वच प्रकारे एकदम परिपूर्ण व परिशुध्द झालेले असते.
''महाराज, एखादा तीक्ष्णधार लावलेला, कोठेही गंज न लागलेला, अगदी सरळ, गाठरहीत नोकदार आणि कोठेही वळसा नसलेला बाण आहे. तो जर जबरदस्त धनुष्यास जोडून शक्तीशाली तिरंदाजाने एखाद्या पातळ रेशमी किंवा मलमल किंवा पातळ उनी कापडाच्या आडव्या पट्टीवर सोडला तर त्या कापडाने त्यास प्रतिबंध होईल काय? त्याच्या कार्यात मंदपणा येईल काय?
''नाही भंते, धनुष्यामधून अत्यंत वेगाने सुटलेल्या तीक्ष्ण बाणास तेवढ्याशा पातळ कापडाने कसा काय मंदपणा येऊ शकेल? ''
''ते का बरे? ''
''का की, इतके पातळ आणि मऊ कापड आहे आणि बाण तिक्ष्ण असून बाण सोडणारा शक्तीशाली आहे? ''
''महाराज, त्याचप्रमाणे बुध्दत्व प्राप्त केलेल्या लोकांचे चित्त सर्वच विषयात अत्यंत तीक्ष्ण व दृतगती असते. असे का घडते? का की, ते सर्व प्रकारे परिपूर्ण व परिशुध्द असतात, हाच चित्ताचा सातवा प्रकार होय.
''महाराज, हे जे सातव्या प्रकारचे सम्यक सम्बुध्दाचे चित्त आहे, ते बाकी सर्व चित्तांपेक्षा सर्वच प्रकारने श्रेष्ठ असते. ते आपल्या अपरिमित गुणामध्ये हलके व शुद्ध असे असते. महाराज, त्यांचे चित्त इतके हलके आणि शुद्ध असल्या कारणानेच भगवान सम्यक सम्बुध्द दोन्ही प्रकारच्या ऋध्दीशक्ती दाखवू शकतात. यावरुनच त्यांच्या चित्ताची शुध्दता व हलकेपणा दिसून येतो, याशिवाय त्या ऋध्दीशक्तींचे दुसरे कोणते कारण दिसत नाही. या ऋध्दीशक्तींचे सुध्दा भगवान बुध्दाच्या चित्ताशी तुलना केली तर त्याही अत्यल्प वाटतात. तरीपण भगवान बुध्दांची सर्वज्ञाता 'अवर्जन' प्रतिबध्द ( इच्छा करताच सिध्द होणारी ) अशी होती. ज्या गोष्टी जाणून घ्यावयाच्या आहेत त्या क्षणात चिंतन ( ध्यान ) करुन बुध्द जाणून घेत असत. यातच त्यांची सर्वज्ञता होती.
''महाराज, जसा कोणी मनुष्याने अगदी सुलभतेने एखादी वस्तू आपल्या हातातून दुसर्याच्या हातात द्यावी, तोंड उघडताच आवाज केला जावा; तोंडात पडलेला घास गिळून टाकावा, डोळे मिटल्यावर ते उघडता यावे, हात मागेपुढे करावे. याप्रमाणे किंवा याहीपेक्षा अधिक सुलभतेने बुध्द आपल्या सर्वज्ञतेच्या बळावर जी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असेल ती जाणून घेत असत. तथापि ते ध्यानावस्थेत जरी नसले तरी त्यांना सर्वज्ञ या संबोधाशिवाय दुसरे संबोधन त्यांच्याकरीता लावता येणार नाही़.''