राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, बौध्द भिक्खूंना आपले शरीर प्रिय असते की नाही? ''
भंते नागसेन म्हणाले, ''नाही़ महाराज, ते शरीरावर प्रेम करीत नाही़. ''
''भंते, तर मग आपण लोक शरीराची इतकी काळजी का घेता? शरीराप्रती इतका आदर का बाळगता? ''
''महाराज, आपण लढाईवर गेले असता आपणास एखादा तीर लागतो की नाही?''
''होय भंते, लागतो. ''
''महाराज, अशावेळी आपण ज्या जखमेस तेल व मलम लावून चांगल्या प्रकारे पातळ पट्टीने बांधता की नाही? ''
''होय भंते, आम्ही तसे निश्चितच करतो.''
''महाराज, तुमची जखम तुम्हाला प्रिय असते की काय, जेणेकरून त्यावर मलम व तेल लावून काळजीपूर्वक पातळ पट्टी त्यावर बांधता?
''भंते, त्यावेळी मला माझी जखम प्रिय नसतेच परंतु जखम बरी होऊन तेथे नवीन मांस वाढावे म्हणून हे उपचार करावे लागतात. ''
महाराज, याप्रमाणेच आम्हा भिक्खूंना आमचे शरीर प्रिय नसते परंतु शरीराप्रती आसक्ती न ठेवता शुद्ध ब्रह्मचर्येचे पालन करण्यासाठी एवढी त्याची काळजी वहावी लागते. भगवंतांनी तर शरीरास एका फोड्याची उपमा दिली की- ''ओल्या त्वचेने झाकलेले हे शरीर म्हणजे एक नऊ मुखांचा फोडा आहे, त्यातून सदैव दुर्गंधाचाच उत्सर्ग होत असतो.''
''भंते, आपण उत्तमरितीने पटवून दिले. ''
* भगवान बुध्द सर्वज्ञ होते....
राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, भगवान बुध्द सर्वज्ञ आणि सर्व काही पाहणारे होते काय? ''
''होय महाराज, ते सर्वज्ञ आणि दूरदृष्टी वाले होते.''
''भंते, असे असताना देखील त्यांनी आवश्यकतेनूसार निरनिराळ्या प्रसंगी विनय तयार करण्याची रीत कशी काय अवलंबिली? एकाच वेळी सर्व विनय का बरे केले नाहीत? ''
''महाराज, सर्व प्रकारच्या औषधांची माहिती असलेला आपला कोणी वैद्य आहे काय? ''
''होय भंते, आहे. ''
''महाराज, तो आजारी पडल्यानंतरच औषध देतो की आजारापूर्वीही देत राहतो? ''
''भंते, आजारी पडल्यानंतर कोणाला औषध देतो, त्यापूर्वी नाही़. ''
''महाराज, याप्रमाणे भगवान बुध्द जरी सर्वज्ञ आणि सर्वद्रष्टे होते तरी देखील योग्यवेळ आल्याशिवाय त्यांनी कधीही आपल्या श्रावकासाठी कोणताही विनय तयार केला नाही़, अगर त्यांचा उपदेशही ते देत नव्हते. प्रसंग उद्भवल्यावरच भगवंतांनी असे नियम तयार केले आणि ते आजिवन आचरणात आणण्याचा उपदेश दिला.''
''भंते, आपण बरोबर सांगितले. ''
No comments:
Post a Comment