राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, तुम्ही लोक संसार संसार म्हणून उल्लेख करता, तर तो संसार काय आहे? ''
''महाराज, जीवप्राणी येथे जन्म घेतो व येथेच मृत्यू पावतो. येथे मृत्यू पावल्यानंतर दुसर्या ठिकाणी जन्म घेतो, तेथे जन्म घेऊन तेथेच मृत्यू पावतो. तेथे मृत्यू पावल्यानंतर पुन्हा तिसर्या अवस्थेत जन्म घेतो. संसाराचा हाच अर्थ आहे. ''
''कृपा करुन उदाहरणाने स्पष्ट करावे. ''
''महाराज, कोणी मनुष्य पिकलेला आंबा खातो व त्याची कोय ( बीज ) जमीनीत पुरतो. त्याला अंकुर फूटून त्यापासून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्याला आंबे लागतात. ते पिकल्यानंतर तो मनुष्य पुन्हा ते आंबे खाऊन त्याची कोय जमीनीत पुरतो. यापासून अजून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्यालासुध्दा फळे येतात, याप्रमाणे झाडापासून आंबे, आंब्यापासून झाड असे हे कोडे कोणीही उकलू शकत नाही. अर्थात याचा शेवट कोठेच होत नाही़.'' महाराज, याप्रमाणेच जन्मास येणे व मरणे, हाच संसार होय.''
''भंते, आपण छान समजावून सांगितले. ''
» स्मृतीचे स्मरण होते...
राजा मिलिंद म्हणाला, ''पूर्वी केलेल्या कृत्यांचे किंवा घडलेल्या गोष्टींचे स्मरण कसे होते? ''
''स्मृतीने स्मरण होते महाराज! ''
''भंते, स्मृतीने कसे, चित्तामुळे स्मरण होत असते ना? ''
''महाराज, आपण केलेले एखादे कार्य आता विसरलेत काय? ''
''होय भंते! ''
''महाराज, त्यावेळी आपल्याला चित्त नव्हते काय? ''
''भंते, चित्त होते, स्मृती नव्हती.''
''महाराज, मग आपण कसे म्हणाले की, चित्ताने ( मनाने ) स्मरण केले जाते, स्मृतीने नव्हे? ''
''भंते, आता मला बरोबर समजले.''
» स्मृतीचे उगमस्थान...
राजा म्हणाला, ''भंते, स्मृती नेहमी चित्तातूनच उत्पन्न होते की दुसर्या बाहेरील वस्तूपासून देखील उत्पन्न होते? ''
''महाराज, चित्तातून ( मनातून ) ही उत्पन्न होते आणि दुसर्या बाहेरील वस्तूपासून देखील उत्पन्न होते. ''
''भंते, परंतु सर्वच स्मृत्या चित्तातून उत्पन्न होतात, दुसर्या बाह्य वस्तूपासून नव्हे. ''
''महाराज, जर बाह्य गोष्टीमुळे स्मृत्यांचा उगम झाला नसता तर शिल्पकला ही दुसर्या कडून शिकण्याची, अभ्यास करण्याची अवश्यकता मुळीच राहिली नसती आणि गुरुसुध्दा निरर्थक ठरतील. परंतु अशी स्थिती नाही.''
''छान भंते, फार छान. ''
No comments:
Post a Comment