राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, आपली माता मरण पावली असता रडून रडून ढासळलेले अश्रू आणि धर्म प्रेमाने ओघळणारे अश्रू यांपैकी कोणते अश्रू उपकारक ठरतात. म्हणजे कोणते योग्य आणि कोणते अयोग्य मानावे?"
''महाराज, पहिल्या प्रकारचे अश्रू राग, द्वेष व मोह यातून उद्भवल्यामुळे गरम व मलीन आहेत, तर दुसर्या प्रकारचे अश्रू निर्मळ व थंड आहेत. कारण या अवस्थेत मन अत्यंत पवित्र आहे. महाराज, थंड व निर्मळ अश्रू उपकारक व योग्य आहेत, तर गरम व भावनायुक्त अश्रू निरुपयोगी व वाईट आहेत. ''
''भंते, आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले. ''
राजा म्हणाला, ''भंते, रागाने भरलेले व रागरहित चित्त यातील भेद कोणता? ''
''महाराज, यातील एक तृष्णेत बुडून गेला असतो, तर दुसरा नसतो.''
''भंते, म्हणजे याचा अर्थ काय समजावा? ''
''महाराज, एक अत्यंत लोभी व स्वार्थी असतो तर दुसरा निर्लोभी व शांत असतो.''
''भंते, परंतु मी या प्रश्नाकडे पाहतो, तेव्हा असे दिसून येत, की रागयुक्त असो की रागरहित, हे दोघेही खाण्याकरिता चांगल्याच पक्वान्नाची इच्छा धरतात, वाईट पक्वान्नाची तर कोणी इच्छा धरीत नाहीत.''
''महाराज, हे जरी खरे असले तरी, रागयुक्त व्यक्ति उत्तम भोजनाचा आस्वादही घेतात आणि त्यात रागही व्यक्त करतात. परंतु रागरहित व्यक्ति आस्वाद घेतात खरे पण त्यात राग मुळीच मानत नाही.''
''भंते, आपण फारच छान समजावून सांगितले. ''
No comments:
Post a Comment